⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आदिशक्ती मुक्ताई वारी पालखीने पंढरपूरकडे केले प्रस्थान

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । आदिशक्ती मुक्ताई आषाढी आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पहाटे सहा वाजता काकडा आरतीने झाली. संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता मूळ स्थानावरून पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी पालखी सोहळ्यात खा. रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकुटुंब दर्शन घेतले.

गजानन महाराज मंदिरावरून परिवर्तन चौक, बस स्थानकाकडून पालखी नीळकंठ महाजन यांच्या घरी पोहोचली. तिथेच दुपारचे भोजन झाले. त्यानंतर सातवड या गावी पालखीचा पहिला मुक्काम झाला. कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा पालखी रवाना झाल्याने, वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह जाणवला. राज्यभरातील विविध भागांमधील वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील वारकऱ्यांचाही समावेश आहे. पालखी सोहळ्यात टाळकरी फडावरील कीर्तनकार व वारकरी हजारोच्या संख्येने सहभागी झालेले आहेत.

७०० किमीचा ३४ दिवसांचा प्रवास

आदिशक्ती मुक्ताई पालखीचे यंदा ३१३वे वर्ष असून, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पालखीचा मान मुक्ताई पालखीला मिळतो. पालखीचा पायी प्रवास ७०० किमीचा व ३४ दिवसांचा आहे. पंढरपूरला सर्वप्रथम अगोदर पोहोचणारी मुक्ताईची पालखी आहे. पालखीच्या वाटेत ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांसाठी भोजन व फराळाची व्यवस्था केली आहे.