⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; DAP खताच्या किंमती झाल्या कमी ; आता २४०० ऐवजी मिळणार ‘इतक्या’ रुपयाला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने  डीएपी खतासाठीचे अनुदान 500 रुपये प्रति पिशवी वरून 140% वाढवून 1200 रुपये प्रति पिशवी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे डीएपीच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ होत असूनही,1200 रुपये रुपये प्रति पिशवी या जुन्या दराने विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे 2400 रुपयांऐवजी DAP खताची एक बॅग आता फक्त 1200 रुपयांत मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली खत दराच्या प्रश्नावर उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी डीएपीची प्रत्यक्षात किंमत प्रति पिशवी 1,700 रुपये होती. ज्यामध्ये केंद्र सरकार 500 हजार रुपयांचे अनुदान देत होते. त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना 1200 रुपये प्रति पिशवी दराने खताची विक्री करीत होत्या.

अलीकडेच, डीएपीमध्ये वापरण्यात येणारे फॉस्फोरिक ऍसिड  अमोनिया इत्यादींच्या आंतराष्ट्रीय किंमती 60% ते 70% पर्यंत वाढल्या आहेत. या कारणामुळे डीएपीच्या एका पिशवीची प्रत्यक्ष किंमत सध्या  2400 रुपये आहे, 500 रुपयांचे अनुदान वजा करून  खत कंपन्यांमार्फत 1900 रुपयांना या  पिशवीची विक्री केली जाते. आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 1200  रुपये किंमतीतच डीएपी खताची पिशवी मिळत राहील.

केंद्र सरकार दरवर्षी रासायनिक खतांच्या अनुदानावर सुमारे 80,000 कोटी रुपये खर्च करते. डीएपीसाठी अनुदानाच्या वाढीसह खरीप हंगामात अनुदानासाठी भारत सरकार 14,775 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करेल.