⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! जळगावसह महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३६ अंशांपुढे गेला असून उन्हाचा चटका बसू लागला आहे. मात्र अशातच ७ आणि ८ मार्च राेजी जिल्ह्यासह महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मंगळवारी (8 मार्च) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.

दरम्यान, काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्यासह रब्बी हंगामातील अन्य पीकांना या वादळी पावसाचा धाेका आहे. वाऱ्यामुळे मका पिकाचे नुकसान हाेण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.