⁠ 
रविवार, मे 19, 2024

महत्वाची बातमी! 11 ऑगस्टपासून कन्नड घाटात ‘या’ वाहनांनाच वाहतुकीसाठी परवानगी, या वाहनांवर बंदी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२३ । छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव (Aurangabad-Jalgaon) जिल्ह्याला जोडणारा औट्रमघाट म्हणजेच कन्नडच्या घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी औरंगाबाद खंडपीठाने एक महत्वाचा निर्णय दिला. औट्रमघाट (कन्नड घाट Kannada Ghat) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

घाटातील जड वाहतुकीबाबत तीन वकिलांनी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, शुक्रवारी या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सविस्तर सुनावणी पार पडली असून यावेळी औट्रमघाट (कन्नड घाट) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश औरंगाबाद आरटीओ आणि जळगाव आरटीओ, औरंगाबाद पोलीस अधीक्षक आणि जळगाव पोलिस उपाधीक्षक यांना देण्यात आले आहेत.

या वाहनांनाच परवानगी :
औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, लक्झरी बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, फायर ब्रिगेड गाड्या, शेती उपयोगी ट्रॅक्टर, एम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने यांनाच वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे.

या वाहनांना असेल घाटातून बंदी
जड वाहने, मल्टीएक्सल व्हेइकल, हेवी ट्रक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहून नेणारे टँकर, लक्झरी खासगी बस आदींना बंदी घातली. 

दरम्यान यावेळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी देखील आपली बाजू मांडली. कन्नड घाटातून जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केल्याने टोलचे नुकसान होईल असे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी मांडले. दरम्यान यावर बोलतांना न्यायालयाने, या घाटातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल, या घाटात घडणारे गुन्हे यांचा संदर्भ देत त्यांचे म्हणणे फेटाळून लावले.