⁠ 
बुधवार, मे 1, 2024

खाटीक कुटुंबाच्या मदतीला धावले भाजप उपाध्यक्ष !

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । चोपडा तालुक्यातील अडावद येथील गरिबीत आलेले आजारपण माणसाला असहाय करून टाकते. पण चोपडा तालुक्यातील खाटीक कुटुंबीयांच्या मदतीला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश शांताराम पाटील धावून आल्याने त्यांच्या मदतीने वैद्यकीय उपचार उपलब्ध झाल्याने कोरोनाच्या या महाभयंकर काळात पाच वर्षीय खुशबुची असाध्य आजारातून सुटका करीत तिच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले.

खुशबु इम्रान खाटीक (वय ५ वर्ष) परिवारातील एकुलती एक कन्या.खेळण्याबागळण्याचे वय मात्र एका दुर्धर आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त खुशबुला परमेश्वराने जन्माला तर घातले पण जन्मत:च शारीरिक व्याधीसोबतच शौचाची जागा नसल्याने खुशबुचा जन्मत:च जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यामुळे बापाची पायाखालची वाळूच सरकली. इतक्या लहान वयात मुलीला शौचास जागाच नसल्याने तिचे सतत पोट फुगत असे. व्याधीग्रस्त खुशबुचे वडील इम्रान खाटीक हे हाताने अपंग असुन चोपडा तालुका सुतगिरणित हमालीचे काम करून आपल्या कुटुंबाचे रहाटगाडे चालवितात. खुशबुच्या ह्या आजाराने त्यांच्या जीवनात संघर्ष हा पुजलेलाच असल्याने ते हताष झालेत. अश्यातच वेले ता. चोपडा येथील उपसरपंच दीपक पाटील यांना इम्रान खाटीकची ही परिस्थिती अवगत झाली.

सध्या कोरोनाच्या विळख्याने सर्व दवाखाने हाँस्पिटल हाऊस फुल्ल आहेत. अश्यातच त्यांना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील यांचा रूपाने आशेचा किरण दिसला. दिपक पाटील यांनी राकेश पाटील यांना इम्रान खाटीक यांची व्यथा सांगितली. त्यानंतर हळव्या स्वभावाचे युवा कार्यकर्ते राकेश शांताराम पाटील वडगावकर यांनी सदरहू कुटुंबाची भेट घेत धीर दिला तातडीने नाशिक येथे खुशबुच्या या आजारावर उपचार करण्याची व्यवस्था केली. खाटीक कुटुंबाची साधारण परिस्थिती बघता राकेश पाटील यांनी स्वत:च्या खिशातून दोन हजार रूपये प्रवास भाड्यासाठी देत नाशिक येथे पाठवून तेथील एका रूग्णालयात सुमारे पाच लाख रूपये खर्चाचे आँपरेशन मोफत करून देत खुशबुची असाध्य आजारातून सूटका झाली.

स्वत: कोरोना बाधित होवून सुध्दा रूग्णांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या राकेश शांताराम पाटील यांच्या रूपाने खाटीक कुटुंबियाना एक प्रकारे देवदुताचीच ओळख झाली आणि भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी मारलेली सहानुभूतीसह दातृत्वरूपी वैद्यकीय मदतीची फुंकर पाच वर्षीय चिमुकलीच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणारी ठरली हे विशेष.