⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

..अखेर भुसावळ – देवळाली मेमू आजपासून धावणार, परंतु..

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर तब्बल अडीच वर्षापासून बंद असलेली भुसावळ – देवळाली अखेर आज (१५ सप्टेंबर) पासून धावणार आहे. मात्र पूर्वीच्या शटलच्या जागेवर ही गाडी मेमू स्वरुपात आणि एक्स्प्रेसचा दर्जा घेऊन धावणार आहे. त्यामुळे तिकिटाचे दरही वाढले असून प्रवाशांना अधिक तिकीट दरांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच या गाडीचे ८ स्थानकांवरील थांबे रद्द करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर मार्च 2022 मध्ये सर्वच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून भुसावळ-देवळाली शटल बंदच होती. मात्र तब्बल अडीच वर्षांनंतर ही गाडी आज 15 सप्टेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येत आहे. मात्र, आता शटलच्या जागेवर ही गाडी मेमू स्वरुपात आणि एक्स्प्रेसचा दर्जा घेऊन धावणार आहे. गाडी क्रमांक 11114 ही आज गुरुवारी (दि.15) सायंकाळी 5.30 वाजता देवळालीसाठी सुटेल. तर गाडी क्रमांक 11113 डाऊन देवळाली येथून ही गाडी उद्या 16 सप्टेंबरला सकाळी 7.20 वाजता भुसावळसाठी निघेल.

या ८ स्थानकावरील थांबे रद्द
वाघळी, ऊगाव, भादली, पिंपरखेड, पांझण, अस्वली, ओढा, समीट या स्थानकावरील गाडीचे थांबे रद्द केले आहेत. एका स्थानकावरून संबंधित गाडीची किमान 25 तिकीटे काढली गेली पाहिजे, तरच तेथे थांबा असताे. मात्र, 8 स्थानकांवर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने थांबे रद्द केले आहेत.

दरम्यान, भुसावळ-देवळाली मेमू स्वरूपात धावणार असली तरी दुसरीकडे मात्र प्रवाशांना भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे. या गाडीला रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. यामुळे तिकीट दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. भुसावळहुन सुटणाऱ्या या देवळाली पॅसेंजरचे पूर्वी भुसावळ देवळालीपर्यंतचे तिकीट ५५ रूपये होते. मात्र, ४० टक्के तिकीट दरवाढीमुळे भुसावळ ते देवळालीचे तिकीट ५५ रुपयांवरून ९५ ते १०० रुपयांच्या घरात आकारण्यात येणार आहे. तसेच जळगाव ते चाळीसगावचे तिकीट हे पूर्वी २५ रूपये होते ते ५० रूपये होण्याची शक्यता आहे.

चाकरमान्यांची गैरसोय कायम
भुसावळ-देवळाली शटल ही मेमूच्या स्वरूपात धावणार आहे. असं असले तरी प्रवाशांची गैरसोय मात्र कायम राहणार आहे. कारण पूर्वी देवळाली येथून सुटणारी ही गाडी चाळीसगावला सकाळी ७.३० वाजेला, पाचोरा येथे सुमारे सकाळी ८.३० वाजेला जळगाव येथे ९.४५ वाजेच्या सुमारास तर भुसावळ येथे १०.३० वाजेच्या सुमारास पोहोचत होती. मात्र आता या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आल्याने चाकरमान्यांची मात्र गैरसोय कायम राहणार आहे.