⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

पावसाळ्यात वीजयंत्रणापासून सावधान, महावितरणचे नागरिकांना आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । महावितरणचे नागरिकांना आवाहन पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्विच बोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीज अपघात टाळण्यासाठी सदैव सावध व सतर्क राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पावसाळ्यात वीजयंत्रणेच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक वस्तूपासून सावध राहणे आवश्यक आहे. विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्विच बोर्ड व वायर्स हाताळणे, घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे तसेच तुटलेल्या वीजतारा, खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तूंच्या साह्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक गोष्टींमुळे वीज अपघातांचा धोका असतो.

घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये व जनावराच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्विचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्विच बोर्डपासून बंद करावीत. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात दक्ष राहून विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत व त्यास दुचाकी टेकवून ठेवू नयेत. विद्युत खांबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.

यासोबतच सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्विच बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. सावधगिरी बाळगल्यास या दुर्घटना टाळता येतात. पाऊस आणि वार्‍याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. वीजखांब वाकतो व वीजतारा तुटतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तारांपासून सावध राहावे. तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा. शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. वीजयंत्रणेपासून धोका निर्माण झाल्याची शक्यता वाटल्यास किंवा शंका आल्यास नागरिकांनी ताबडतोब महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-१०२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजपुरवठा खंडितची तक्रार करा ‘मिस कॉल’ व ‘एसएमएसवर

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार ‘मिस कॉल’ व ‘एसएमएस’ करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीकृत मोबाइलऐवजी इतर क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर ‘मिस कॉल’ दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या एका ‘एसएमएस’द्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंज्युमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल ऍप अथवा १८००-२३३-३४३५, १८००-१०२-३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो. याशिवाय NOPOWER टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल. स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल ऍप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा अबाधित आहे.