⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

गणेश उत्सवानंतर आता नवरात्रौउत्सवावरही महागाईच ग्रहण

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात निर्विघ्नपणे गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आता नवरात्र उत्सवाला देखील केवळ १३ दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच मुर्त्यांच्या कामाला वेग आला आहे. मूर्तिकारांना पावसामुळे मूर्ती पूर्ण करण्यात जरी अडचणी येत असल्या तरी मूर्तिकार अडचणींना दूर सारत मोठ्या उत्साहात मुर्त्या बनवत आहेत. मात्र यंदा नवरात्र उत्सवावर देखील महागाईचे ग्रहण दिसणार आहे.

गतवर्षापेक्षा यंदा वीस ते तीस टाक्यांनी मुर्त्यांमध्ये भाववाढ झाल्याची दिसत आहे. पीओपी ने बनवलेल्या देवीच्या मुर्त्या या दहा ते बारा हजार रुपयात विकल्या जात आहेत. तर मातीने बनवलेल्या देवीच्या मुर्त्या या अठरा ते वीस हजार रुपयात विकल्या जात आहेत. सरासरी मूर्तीची उंची ही पाच फूट आहे. नवरात्र उत्सवाला तेरा दिवसांनी प्रारंभ होणार असल्यामुळे शहरात विविध ठिकाणी देवींचे मूर्तिकार मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत. विविध आकाराच्या देवीच्या मुर्त्या बनविण्यास मूर्तिकारांनी प्रारंभ केला आहे.

जळगाव शहरात सरासरी पाच फुटाहून अधिक अशा मुर्त्या बनवण्यात येत आहेत. पीओपी व मातीच्या अशा दोन्ही प्रकारच्या मुर्त्या तयार करण्यात येत आहेत.

जळगाव शहरातील मूर्तिकार मोठ्या सेवाभावाने देवीच्या मुर्त्या बनवत आहेत. कोणतीही मूर्ती बनवण्यासाठी लागणारी सुतळी महागली असल्यामुळे यंदा भाव वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. गतवर्षी 70 ते 80 रुपयात मिळणारी सुतळी आज 120 रुपये किलो झाली असल्याने ही भाव वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

तर दुसरीकडे शाडूची माती २०० रुपयाला विकत मिळायची. तीच माती आता ६०० रुपयाला विकत मिळत असल्यामुळे भाव वाढ झाली आहे. मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्वच कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्यामुळे मूर्तींच्या किमती महागल्या असल्याचे रामपाल या मूर्तिकारांनी सांगितले.