⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खिर्डी’च्या आरोग्य केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत खिर्डी खु, येथील गावाची लोकसंख्या अंदाजे पाच ते सहा हजाराच्या जवळपास आहे. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घाणीच्या साम्राज्यात व विखळ्यात पडलेल दिसून येत आहे. आरोग्य उपकेंद्रा’च्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात वस्ती असून येथील काही ग्रामस्थ आरोग्य केंद्रात गुरे, ढोरे बांधत असतात व त्याचे शेणखत व उकीरड्यांचे ढीगारे आरोग्य केंद्रात टाकत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत असून ग्रामस्थांमधून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आरोग्य केंद्राच्या परिसरात उकीरडे साचत असल्याने त्यात डास व मच्छरांचा उपद्रव वाढू शकतो. पर्यायाने आरोग्य केंदाचेच आरोग्य धोक्यात असून ग्रामस्थांचे काय आरोग्यात काय सुधारणा होईल अशी चर्चा सर्वत्र होतांना दिसून येत आहे. आरोग्य केंद्राच्या रिक्त जागेत अनेक वर्षा पासून टाकण्यात येत असलेल्या उकीरड्याचे व कचऱ्यांचे ढीगारे साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व साथीचे आजारा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव नाकारता येणार नाही. व यामुळे रोगराई निर्माण होवून अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण देण्यात येत आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला दिसून येत आहे.

आरोग्य केंद्र भाडे तत्त्वावर दिले की काय?

या आरोग्य केंद्र नेहमी गुरेढोरे बांधलेले दिसत असतात तसेच त्यांचा चारा व उकीरड्यांचे ढीगारे टाकलेले सून या आरोग्य केंद्रात कोणी आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक असतात की नाही? या उकीरड्यांमुळे व रोगराईमुळे कोणाच्या आरोग्यास दुर्दैवाने काही धोका निर्माण झाल्यास याचे जबाबदार आरोग्य प्रशासन राहील का ? आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात ही उकीरडे टाकत असून नेमके कारण ग्रामस्थांना समजले नसून संबंधीत उकीरडे धारकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर जात नाही ना व आरोग्य उपकेंद्राची रिक्त जागा संबंधित आरोग्य अधिकारी यांनी भाडेतत्त्वावर तर दिली नाही ना असाही प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे.

आरोग्य केंद्र आरोग्यसेवीकेच्या प्रतिक्षेत

या आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविकेचा पदभार दोन ते तीन महिन्यापासून बदली झाल्यामुळे हे पद रिक्त असून या बाबत मागणी करण्यात आली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप ग्रामस्थ करीत असून इथे आरोग्य सेविका नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असतांना दिसत आहे. तसेच ग्रामस्थांकडून संताप्त व्यक्त केला जात आहे. खिर्डी खु. या गावाची लोकसंख्या मोठी असल्याने या गावात एक उपकेंद्र असल्याने त्यात खिर्डी तसेच रेंभोटा व वाघाडी, भामलवडी, पुरी गोलवाडे शिंगाडी असे छोटेमोठे खेडे गाव व वस्त्या असल्याने आरोग्यसेविका नसल्यामुळे रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी येथून तिन ते चार किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. यामुळे नागरिकांची हेळसांड होते. तर काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे, लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने येथे एक तरी आरोग्यसेविका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच आरोग्य केंद्र आरोग्य सेविकेच्या प्रतिक्षेत दिसत आहे.