जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील मोठ्या ऐतिहासीक वारसा असणारे पिंप्राळा रेल्वे गेट दि. १२ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले. हे रेल्वे गेट गेल्या ६२ वर्षांपासून भोईटेनगर, प्रेमनगरवासीयांसह परिसरातील नागरिकांना पलीकडे जाण्या-येणाऱ्यांसाठी सोईचा व जवळचा मार्ग बंद झाल्याने येथील नागरिकांना उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा राहणार आहे.
मात्र, तोपर्यंत परिसरातील नागरिकांना बोगद्यातून वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध आहे. रेल्वे प्रशासनाने देशभरातील रेल्वे गेट बंद करून येथे उड्डाणपूल वा भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जळगावातील आसोदा व पिंप्राळा रेल्वे गेटलगत उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या नुसार १९६० पासून सुरू असलेले पिंप्राळा रेल्वे गेट सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
पिंप्राळा रेल्वे गेट सुरू होते तेव्हा मालधक्यावरील संपूर्ण वाहतूक ही रिंग रोड वरून होत होती. ही वाहतूक जड वाहनांची असल्याने रिंग रोडवासीयांना आता जोपर्यंत या गेटवरील उड्डाणपूल तयार होत नाही, तोपर्यंत धूळ व आवाजाच्या प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आता मालधक्क्यावरील मालाची वाहतूक निमखेडीकडे जाणाऱ्या जुन्या महामार्गाच्या रस्त्याकडून गुजराल पेट्रोल पंपाकडे होणार आहे.

दिवसभरात ६० वेळा गेट व्हायचे बंद
गाड्यांसह मालवाहतुकीच्या गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिवसभरात हे रेल्वे गेट ६० वेळा बंद राहत होते. त्यामुळे या गेटवर अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असे. मात्र, हा उड्डाणपूल तयार झाल्यावर रेल्वेमुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही. तोपर्यंत पिंप्राळा, भोईटेनरगर व प्रेमनगरातील नागरिकांना बजरंग बोगदा व शिवाजीनगर उड्डाण पुलाचा पर्याय उपलब्ध आहे.











