जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । रविवारी रात्रीनंतर सोमवारीदेखील दुपारी १२ वाजेपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाचे ११ दरवाजे उघडून, सात हजार ४६० क्युसेस वेगाने विसर्ग होत असल्याने पांझरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सोमवारी अमळनेरचा आठवडे बाजार असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची आणि व्यावसायिकांची भंबेरी उडाली. पांझरा वगळता तालुक्यात अन्य नद्यांच्या पाणलोटक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बोरी नदीवरील तामसवाडी धरणात साठा वाढलेला नाही. भिजपावसामुळे अद्याप शेतांमधून बाहेर पाणी न निघाल्याने नालेदेखील कोरडे आहेत. शेतांमध्ये तणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. निंदणी, कोळपणी अशी कामे सुरू असून, त्यात पावसाचा अडथळा येत आहे.












