जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । यंदाच्या वर्षीचा पाऊस हा जळगाव जिल्ह्यात असला तरी गिरणा धरण क्षेत्रावरील बागलान पट्ट्यात फारसा पाऊस नव्हता त्यामुळे कासवगतीने का होईना पण गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून आज उशिरापर्यंत गिरणा धरणाने 80 टक्केपर्यंत जिवंत पाणी साठ्याची पातळी गाठली होती.
सध्या गिरणा धरणावरील नाग्या-साक्या व अन्य बंधाऱ्यातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आणि या पुढील पाच दिवस जळगाव सह नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असल्याने गिरणा धरण क्षेत्रावरील गावात पडणाऱ्या पावसाकडे गिरण पाटबंधारे विभागाचे लक्ष असून पावसाचे सातत्य असेच कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी गिरणा धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ शकते.
त्या अनुषंगाने धरणावरील क्षेत्रावर चोवीस तास पहारा वाढला असून कोणत्याही क्षणी अंदाज पाहून गिरणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो असा अंदाज पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. आधीच मन्याड धरण 100% पाणी क्षमतेने भरलेले आहे. नांदगाव तालुक्यातही सुरु असलेला मुसळधार पाऊस त्यामुळे मन्याड धरणातून गिरणा नदी पात्रात पंधरा हजार क्युसेक पाणी वाढत असल्याने सायगाव पिनकोड पासून गिरणा नदीचा महापूर आलेला आहे. त्यातच गिरणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते त्या अनुषंगाने गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.