जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज प्रत्यक्ष दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे संपूर्ण खान्देशसह महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे मोठे अमूल्य श्रद्धास्थान आहे. या पवित्र वास्तूमध्ये अचानक लागलेल्या आगीत संस्थानचे मोठे नुकसान झाले असून, या घटनेमुळे भाविकांमध्ये आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आज शुक्रवारी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यांनतर ना गुलाबराव पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा व तालुका प्रशासनाला तात्काळ आणि युद्धपातळीवर अत्यावश्यक उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
पाहणीनंतर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संत सखाराम महाराज वाडी हे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, नुकसान भरून काढण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. यावेळी त्यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला युद्धपातळीवर काम सुरू करण्याचे, पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे तसेच आवश्यक ती मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने राबविण्याचे निर्देश दिले. तसेच, संत सखाराम महाराज वाडी संस्थानाचा वैभवशाली वारसा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.












