जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२६ । महाराष्ट्रात मे महिना म्हणजे भीषण उष्णतेचा प्रकोप मानला जातो. मात्र यंदा वैशाख म्हणजे एप्रिल महिन्यातच राज्य अक्षरशः भाजून निघत असल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी (दि २७) जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. या भीषण उष्णतेमुळे जळगावकर अक्षरशः होरपळून निघाले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

चार वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद
जळगावात सोमवारी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान गेल्या चार वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये जळगावचा पारा ४५.६ अंशांवर पोहोचला होता. सलग वाढणाऱ्या या उष्णतेमुळे जळगावकर पुरते भाजून निघाले आहेत. सोमवारी दुपारी १ वाजेनंतर शहरात जणू अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती होती. रात्री ८ वाजेनंतर तापमान ४० अंशांच्या खाली आले असले, तरी वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे (लू) नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

आज मंगळवारीही तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
तापमान वाढीचे कारण?
हवामान तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे हवा खाली दाबली जात आहे. परिणामी, ढगांची निर्मिती होत नाही आणि सूर्याची प्रखर उष्णता जमिनीवर अडकून पडत आहे. एप्रिल महिन्यात सूर्यकिरणे थेट (सरळ रेषेत) पडत असल्याने जमिनीच्या तापमानात मोठी वाढ होत आहे.








