⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Amalner : रिक्षा उलटल्याने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू ; नुकतेच जमलं होते लग्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे. अशातच अमळेनर तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. यात्रेसाठी बहिणीच्या घरी आली असता यात्रेसाठी रिक्षातून जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. आश्विनी गुलाब भामरे असे मयत तरुणीचे नाव आहे.

हि घटना अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ घडली.या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?
धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी १३ एप्रिल रोजी मेहरगाव येथून अमळनेर तालुक्यातील खेडी खुर्द प्र.ज. येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीसह मेव्हण्यांकडे आली होती. रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत एमएच १९ बीजे ८९९६ या क्रमाकांच्या रिक्षातून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. अश्विनीची बहिण आणि मेव्हणे हे दोघे दुचाकीवरुन रिक्षासोबत मार्गस्थ झाले.

दरम्यान मेहेरगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक या वाहनाने रिक्षाला कट मारला. यामुळे रिक्षा रस्त्यालगत उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनीच्‍या डोक्याला गंभीर दुखापत होवून तिचा जागीच मृत्यू झाला. तर रेखाबाई पाटील व वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले.

अश्‍वीनीचे नुकताच जमले होते लग्‍न
मयत अश्विनीचे काही दिवसापूर्वी लग्न जमले होते. लग्नाची तारीख ठरणार तोच अपघाताच्या रुपाने अश्विनी हिच्यावर काळाने झडप घातली आणि लग्नापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी रविवारी दुपारी निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.