जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२५ । एकीकडे दिवाळीचा पर्व सुरु झाल्याने सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान, राज्यातून मॉन्सून परतल्यानंतरही काही ठिकाणी पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्यानं आज जळगावसह राज्यातील १३ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

आज 19 ऑक्टोबर रोजी राज्याच्या विविध भागांत संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. आज १३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला असून यादरम्यान विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव अशा एकूण १३ जिल्ह्यात यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून माघारी जात असतो. परंतु यंदा परतीचे दिवस वाढल्यामुळे वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.







