⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

गिरणा धरण किती टक्के भरले, तुम्हाला माहित आहे का?

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑगस्ट २०२३ | राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असला तरी गिरणा धरण परिसरात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. जेमतेम पावसामुळे पेरण्या आटोपल्या असल्या तरी नदी-नाले मात्र अद्यापही कोरडेठाक आहेत. त्यातच निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे गिरणा धरण सलग चार वर्षांपासून १०० टक्के भरत असल्याने गिरणा पट्ट्यात आबादानी असली तरी यंदा मात्र जुलै संपत आला तरी धरणातील साठा चिंताजनक होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणेतील जलसाठा हा १९ टक्क्यांवर होता. गत आठवडाभरापासून होत असलेल्या पावसामुळे आता गिरणा धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांच्या वर पोहचला आहे.

जिल्ह्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडणाऱ्या गिरणा धरणात पाण्याची आवक गत आठवड्यापासून वाढली आहे. यामुळे गिरणा धरणातील पाणीसाठी हळूहळू वाढत आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नव्हती. मात्र गत आठवडाभरात गिरणा धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

गतवर्षी हाच साठा ९० टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे यंदा सलग पाचव्यांदा हे धरण १०० टक्के भरणार की नाही, याची चिंता असताना मालेगाव भागातील चणकापूर, ठेंगोडा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गेल्या आठवडाभरात धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. धरणात ३० टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्यास वर्षभराची पाण्याची चिंता मिटते, असे सांगितले जाते. त वर्षात धरणातून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी एकूण ५ आवर्तने सोडण्यात आली होती.