जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । अवकाळीनंतर राज्यात उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. राज्यात उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम देशासह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी उष्णता वाढत आहे. 17 मे पासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता वाढत असून दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.
आयएमडीच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवार, 17 मे पासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर दुपारच्या वेळी पडू नये, बाहेर जाताना छत्री स्कार्फचा वापर करावा असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.
मान्सूनला उशीर होणार…?
मोचा चक्रीवादळ रविवारी म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं. त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा मान्सूनला उशीर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.