जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२५ । राज्यात वेळेआधीच दाखल झालेला मान्सून खोळंबला असून मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने उकाडा वाढला आहे. यातच मंगळवारी जळगावसह राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दरम्यान राज्यात 10 जून पर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसला तरी उत्तर भारतात तयार झालेल्या पश्चिमी चक्रवातामुळे आजपासून आगामी तीन दिवसांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

हवामान विभागाने आज (ता. ४) उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

विशेष जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, जिल्ह्यांमध्ये ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. जळगाव शहरात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेपासून वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने तासभर शहराला झोडपले. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
या जिल्ह्यांना इशारा
हवामान खात्याने आज (ता. ४) उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह नंदूरबार, धुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यानताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.







