जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील मामाजी टॉकीज परिसरातील पेंढारे कुटे वाड्यात नातेवाईकांकडे जागरण, गोंधळाचा कार्यक्रमासाठी जालन्यातील बन्सीपूरा भागातून आलेल्या मामा, भाच्याचा तापीनदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २१) घडली. राम नंदलाल नाटेकर (वय ५५), भाचा आर्यन नितीन काळे (वय 21, दोघेही रा. जालना) असं मृतांची नाव आहे.

नदीत उतरताना आर्यनचा दगडावरुन पाय घसरुन पाण्यात बुडू लागला. यावेळी भाच्याला वाचवण्यासाठी मामाने पाण्यात उडी घेतली. मात्र, ते देखील पाण्यात बुडाले. हा सर्व प्रकार आर्यनची आई म्हणजेच राम नाटेकर यांची बहिण शालिनी काळे व इतर नातेवाइकांच्या डोळ्यासमोर घडला. मदतीची याचना ऐकून अवघ्या २०० मीटरवर असलेल्या मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत मात्र उशीर झाला होता.
दोघेही भुसावळ शहरातील राहुल नगर परिसरातील तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रामराजे नातेकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे, तर आर्यन काळे मागे आई-वडील व भाऊ असा परिवार सोडून गेला. दोन्ही कुटुंबीयांचे हातमजुरीवर उदरनिर्वाह सुरू होता. या दुर्दैवी घटनेची नोंद भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.