जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३ । राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जात आहे. शुक्रवारी भुसावळ शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 45.7 अंश तापमानाची नोंद केंद्रीय जल आयोगाने केली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून उष्माघातामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे तापमानात काही अंशी घट झाली होती. दरम्यान मागच्या चार दिवसांत राज्याचा पारा तापल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातील सर्वात उच्चांकी तापमान भुसावळ येथे नोंद झाली आहे. हॉटसिटी भुसावळात वैशाख वणवा पेटला आहे. शुक्रवारी सर्वाधिक 45.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सूर्य आग ओकत असल्याने शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.
आज (दि.13) राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच, दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यात उष्माघातामुळे दोन महिलांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढत होत असताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात उष्माघातामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. रावेर तालुक्यात देखील नम्रता चौधरी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अमळनेर मधील रुपाली राजपूत यांचे निधन झाल्यानंतर त्यांचं शवविच्छेदन केलं असता उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नम्रता चौधरी महिला आपल्या कुटुंबासोबत भर उन्हात नातलगांकडे एका धार्मिक कार्यासाठी गेली होती. परतत असतात बस स्थानक परिसरात उलट्या होऊन आणि चक्कर येऊन ही महिला कोसळली. यानंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात भरती केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एकंदरीत नम्रता चौधरी यांची लक्षणं पाहता त्यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही