जळगाव लाईव्ह न्यूज । उज्जैनहून महाकालचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या वरणगाव (ता.भुसावळ) येथील ठाकूर कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. बोरगाव बुजुर्ग पोलिस चौकी क्षेत्रातील नॅशनल हायवेवर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये आई, मुलगा आणि अवघ्या पाच वर्षांच्या नातीचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?
वरणगाव फॅक्टरी येथील श्याम विक्रम ठाकूर (४५) हे आपल्या कुटुंबासह अर्टिगा कारने उज्जैनला दर्शनासाठी गेले होते. गुरुवारी रात्री उशिरा ते उज्जैनहून घराकडे परतत असताना, स्वतः श्याम ठाकूर कार चालवत होते. शुक्रवारी पहाटे बोरगाव बुजुर्गजवळ श्याम यांना चालवताना डुलकी लागली आणि कार अनियंत्रित होऊन रस्त्याकडेच्या विजेच्या खांबावर प्रचंड वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला.

या भीषण अपघातात आई-मुलासह सहा वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला. श्याम विक्रम ठाकूर (वय ४५), शोभा विक्रम ठाकूर (वय ६०) आणि शिवन्या श्याम ठाकूर (वय ५, रा. वरणगाव फॅक्टरी, ता. भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. तर या अपघातात पत्नी, दोन मुली आणि इतर नातेवाईकांसह ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
‘फ्रुटी’ मागितली अन् प्राण सोडले; मन सुन्न करणारी घटना
या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे पाच वर्षीय चिमुकली शिवन्या हिचा मृत्यू. अपघातात तिचा एक हात आणि पाय फॅक्चर झाला होता. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ती सर्वांशी हसून बोलत होती. तिने घरच्यांकडे पिण्यासाठी ‘फ्रुटी’ची मागणी केली होती. तिला पुढील उपचारासाठी बुरहानपूरला नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.











