जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय मुंबई–आग्रा महामार्गावर चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावचे रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (४) आणि अंकिता संजय नाफडे (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

काय आहे घटना नेमकी?
नाशिक सिडको कॉलनी (राजीवनगर) येथून मालेगावच्या दिशेने जात असलेली टाटा पंच ही कार (एमएच१५ जेएम ५१८२) उमराणेच्या उड्डाणपुलाच्या आधी भरधाव वेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे ही कार रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळत पलटी झाली.
अपघात इतका भीषण होता फाटक दबले जाऊन त्याचा मोठा मार त्यांना बसला. यामुळे गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती देवळा पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू आहे.
नाफडे कुटुंबाचे मूळ गाव सातोड असले तरी ते गेल्या काही वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्यास होते. होळी उत्सवानिमित्त देवदर्शनासाठी संपूर्ण कुटुंब गावी येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.











