⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ गावात बनणाऱ्या शेती आवजारांची संपूर्ण देशात आहे मागणी

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप। सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. सगळीकडे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. घरात लागणाऱ्या लहान सहान गोष्टी पासून ते देशाला लागणाऱ्या मोठ्या गोष्टी या सर्व आजकालच्या युगामध्ये तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. मात्र असं असतानाही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावामध्ये जी शेतीसाठी आवजार निर्माण केली जातात याची मागणी संपूर्ण देशात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आवजारांची निर्मिती ही पारंपारिक प्रक्रियेनेच (पद्धतीने) केली जाते.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव इथे बनणाऱ्या शेत अवजारांसाठी संपूर्ण देशामध्ये प्रचलित आहे. इथे बनलेली शेत आवजारे ही दीर्घकाळ टिकतात. यासाठी या गावातील बनणाऱ्या शेत आवजारांना संपूर्ण देशांमध्ये मागणी आहे. एकीकडे तंत्रज्ञान हे शेती विश्वातही मोठ्या प्रमाणावर वापरले जात असताना दुसरीकडे शेत आवजारांची संख्या कमी होत असली तरी या गावांमध्ये बनणारे शेत आवजार हे संपूर्ण देशामध्ये सुविख्यात आहेत.(famous iron tools of jalgaon)

शेत आवजार जसे की कुऱ्हाड, कोयता, विळा व इतर गोष्टी ज्यामध्ये विविध अवजारांचा समावेश आहे. अशी सर्व शेत आवजारे या गावांमध्ये बनवली जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने ही आवजार बनवली जातात. हे गाव स्वतःच्या आवजारामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे ही जळगाव जिल्ह्यासाठी इतकी महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद गोष्ट जरी असली तरी जळगाव जिल्ह्यातील कित्येक नागरिकांना याबाबत माहिती नाही.

कुऱ्हाड हे नाव ऐकताच आपल्यासमोर एक आवजार उभ राहतं. जे आवजार झाड कापण्यासाठी वापरले जाते. तिथे राहणाऱ्या जुन्या जाणकार ग्रामस्थांच्या मते कुऱ्हाड हे आवजार असल्याने आणि गावाची प्रसिद्धी ही इथे बनवण्यात येणाऱ्या आवजारामुळे असल्यामुळे या गावचे नाव कुऱ्हाड असे पडले. तसं बघायला गेलो तर ह्या तर्काला आपण मान्य ही करू शकतो. कारण कुऱ्हाड हे आवजार शतकोन शतके मनुष्य वापरतो आणि यामुळेच की काय? या गावाचे नाव कुऱ्हाड पडले असे म्हणता येऊ शकतो.

तर कुऱ्हाड गावाच्या शेतमालाच्या अवजाराला कुठेही तोड नाही असं जरी असलं तरी देखील सुरी, पक्कड, साणशी आणि अडकित्ता अशा घरगुती वापराच्या आवजार देखील या ठिकाणी बनवले जातात.

भारतात पाहायला गेलो तर आंध्रप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी येऊन या ठिकाणची आवजार खरेदी करतात. याचबरोबर राज्यातील पुणे, नाशिक, मनमाड, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील रावेर या सर्व ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नागरिक येऊन या ठिकाणी शेत आवजार विकत घेतात.

यामुळे तुम्हाला जळगाव लाईव्हचा हा लेख कसा वाटला ? हे नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून जळगावच्या ‘कुऱ्हाड’ गावाची महती संपूर्ण जगाला समजेल