जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) लाभार्थ्यांच्या यादीत मोठा फेरबदल होणार आहे. या योजनेचा लाभ आता कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे, आणि हे नियम ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेद्वारे सुनिश्चित केले जाईल.
नवीन नियमावली आणि त्याचे परिणाम
पीएम किसान योजनेच्या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. यामुळे एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना लाभ मिळण्याची प्रथा बंद होईल. जर कुटुंबातील इतर सदस्यांना लाभ मिळाल्याचे आढळले, तर त्यांचा पत्ता कट करण्यात येईल.
ई-केवायसी (E-KYC) अनिवार्य
सरकारच्या नवीन गाईडलाईन्स अनुसार, लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. ई-केवायसी न केल्यास, 19 वा हप्ता खात्यात जमा होणार नाही.
आर्थिक मदत आणि हप्त्याची वितरण प्रक्रिया
केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते, जी थेट लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे जमा केली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते, प्रत्येक हप्ता 2 हजार रुपये. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत, आणि आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. हा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपात्र लाभार्थी
या योजनेतून आयकर भरणारे नोकरदार, अल्पभूधारक आणि संवैधानिक पदे धारण केलेल्या व्यक्ती वगळल्या जातील. आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि निवृत्ती वेतन 10,000 पेक्षा जास्त घेणारे व्यक्ती या योजनेच्या पात्रतेच्या बाहेर राहतील.