⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

रेल्वेच्या तिसऱ्या मार्गामुळे अडचणीत येणारा तारखेडा-गाळण रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । भुसावळ ते मनमाड दरम्यान मध्य रेल्वेच्या जलद गतीने सुरू असलेल्या तिसरा रेल्वेमार्गाचे काम पाचोरा पर्यंत येऊन ठेपले असून पाचोऱ्यापासून पुढील कामाचा देखील वेग वाढताना दिसत आहे. दरम्यान, रेल्वेच्या तिसऱ्या मार्गामुळे अडचणीत येणारा तारखेडा-गाळण रस्त्याचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.

मध्य रेल्वेच्या हद्दीतून जाणारा तारखेडा व गाळण रस्ता आणि तेथूनच मध्य रेल्वेचा जाणारा तिसरा मार्ग असल्याने या गावांसह इतर गावांचाही जाणारा रस्ता खंडित होऊ शकतो ही बाब लक्षात आल्यानंतर तारखेडा, गाळणसह पुढील गावातील नागरिकांनी व तारखेडा-गाळण शिवकालीन रस्ता संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतीत पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना भेटून माहिती दिली होती. ही बाब खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे मांडली होती. खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत आपल्या दालनात संबधित अधिकारी यांची बैठक घ्यावी अशी सूचना केली होती. या अनुषंगाने खासदार उन्मेश यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनासह नुकतेच यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी खासदार उन्मेश पाटील,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.सी.ई.ओ.पंकज आशिया,भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे,पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल,मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डी.सी.एम.पंकज धाबारे व संबंधित यंत्रणेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या विषयावर बैठक संपन्न झाली.

या बैठकीत रेल्वेच्या जागेला तिसऱ्या मार्गामुळे पाचोर्‍यावरून तारखेडा-गाळण व इतर गावांना जाणारा रस्ता खंडित होऊ शकतो व त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासन यावर पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे अवगत केले. त्यामुळे तारखेला-गाळण या रस्त्याचा विषय अखेर मार्गी लागला असून त्यामुळे या परिसरातील गावातील नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

या बैठकी प्रसंगी दीपक बोरसे-पाटील,मनोहर पाटील,करणसिंग राजपूत,संजय पाटील यांच्यासह तारखेडा-गाळण शिवकालीन रस्ता संघर्ष समितीचे पदाधिकारी व इतर नागरिक देखील उपस्थित होते.सदर विषय सतत पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल खासदार उन्मेशदादा पाटील यांचे भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्यासह संघर्ष समितीच्या पदाधिकारी व गावातील नागरिकांनी यावेळी आभार व्यक्त केले.