⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

..तर भडगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होणार गंभीर!

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । भडगाव शहरातील हजारो नागरिकांना ज्या विहिरीद्वारे पाणी पिण्यास मिळते त्याच नगरपालिकेच्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून व ज्या ठिकाणाहून पाण्याची आवक आहे असे वढदे या ठिकाणाहून मध्यरात्री जेसीबी द्वारे उत्खनन करून दररोज 20 ते 30 डंपर, व शेकडो ट्रॅक्टरद्वारे वाळू कोरून वाळू चोरीचा सपाटा सध्या वाळू माफियांनी लावलेला आहे. तसेच या वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने गिरणेला पाणी आहे. परंतु  भविष्यात जर दुष्काळाची परिस्थिती आली तर याला जबाबदार कोण ? वाळूमुळे ज्या पाणीचे जमिनीत नैसर्गिक स्रोत आहे. ते वाळू उत्खनमुळे स्त्रोत राहतील का ? भविष्यात भडगाव शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली तर त्यास कोण जबाबदार राहणार ? असे एक ना अनेक प्रश्न सुज्ञ नागरिकांच्या मनात येत आहे.

भडगाव शहरातील नगरपालिकेची मेन वॉटर सप्लाय विहिरी या गिरणा कॉलनीच्या बाजूला आहे. या ठिकाणी वाळू माफियांनी  मध्यरात्री जेसीबीद्वारे नदीपात्रात 100 मिटर लांब 30 फूट रुंद व 10 ते 15 फूट खोल असे अनेक खड्डे नदीपात्रात वाळू उत्खनन करून खोदले आहेत. याकडे भडगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांनी त्वरित लक्ष द्यावे. व भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाई पासून भडगाव शहराला मुक्त करावे अशी मागणी होत आहे.

नाशिक विभागाचे महसूल आयुक्तांनी स्पेशल पथक नेमावे. महसूल विभागाचे अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आठवड्याच्या सातही दिवस स्थानिक वेगवेगळ्या  पथकांची नेमणूक केलेली असते, परंतु हे पथक नुसते नावाला असून कुचकामी ठरत आहे. यासाठी नाशिक विभागाचे महसूल आयुक्तांनी आपले नाशिक येथील पथक, जळगाव जिल्हाधिकारी यांचे पथक, पाचोरा प्रांताधिकारी यांचे पथक असे वेगवेगळे पथक नेमून भडगाव तालुक्यात वाडे, गुढे, कोठली, वढदे, भडगाव गिरणा पंपिंग हाऊस, पिंपळगाव, बांबरुड येथून  अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर वर कारवाई करावी

कारवाई केल्यानंतर हे जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर हे शेतीपूरक कामांसाठी घेतलेले असते. अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी नाही. यामुळे हे जमा करून आरटीओ यांच्याकडून त्याची नोंदणी रद्द करावी. नाशिक विभागाचे महसूल आयुक्तांनी याची तत्काळ दखल घेऊन पथक नेमावे. व भडगाव तहसील कार्यालयातील तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी हे तालुक्यात लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या वाळू माफियावर कारवाई का करत नाही ?? असा सवाल केला जात आहे.