⁠ 
सोमवार, मे 6, 2024

लग्नासाठी आलेल्या विवाहितेचा मृतदेह जंगलात आढळला; घातपाताचा संशय

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी शिवारातील वडोदा वनक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर ४४१ व ४४२ पाण्यात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहासंदर्भात घातपात झाल्याचा संशय रुमाल निशानचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी दाेन दिवसांत योग्य तपास न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

२८ डिसेंबर २१ रोजी ज्योती विलास लहासे (वय ३१) रा.विटवा, ता.रावेर ही हरवल्याची तक्रार महिलेचा मावसभाऊ कैलास तायडे, रा.खामखेडा, ता.मुक्ताईनगर यांनी मुक्ताईनगर पोलिसांत दाखल केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी दीपक मनोरे, सुकलाल वाघ या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून तत्काळ गुन्ह्याची उकल करावी, दीपक मनोरे व सुकलाल वाघ या दोघांवरही ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून दाेन दिवसांत या गुन्ह्याची चौकशी करावी. अन्यथा संघटनेतर्फे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

घातपाताचा संशय, तपासात दिरंगाईचाही आराेप

ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी एकटा मनुष्य जाणार नाही, एवढे घनदाट जंगल असून नाल्यात केवळ पाच ते साडेपाच फूट पाणी आहे. रस्त्यात तीन विहिरी असताना व दोन कि.मी. अंतरावर पूर्णा नदी असताना आत्महत्येसाठी एवढ्या घनदाट जंगलाची निवड करणे, यामुळे घातपाताचा संशय निर्माण होत आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट घेतल्याचे बाविस्कर यांनी नमूद केले. मुक्ताईनगर पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोपही त्यांनी केला. चार दिवस महिलेचा मृतदेह पाण्यात असूनही कुजलेला नाही. याचाच अर्थ तिला एक किंवा दोन दिवस आधी त्या ठिकाणी मारले असावे, असा संशय असल्याचे ते म्हणाले.

हे देखील वाचा :