जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । एस.टी.महामंडळाने कंत्राटी पध्दतीवर घेतलेल्या चालकांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पुन्हा कामावर कायक करावे, या मागणीसाठी राज्यभरातून तब्ब्ल ८०० कामगार आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.

एस.टी. महामंडळाच्या नैमत्तिक (परमनंट) आस्थापनावरील चालक व वाहक यांनी २८ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांच्या मागणीसाठी संप घोषित केला होता. शासनाकडून बरेच प्रयत्न करून संप मिटला नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. या कारणास्तव शासन व प्रशासन यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून ए.टी.मार्फत चालक कंत्राटी पध्दतीने घेण्याचा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ ८०० कत्राटी कर्मचारी दि. १२ जानेवारी २०२२ पासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नेमणूक करुन घेतले. कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची सोय व्हावी तसेच महामंडळाची आर्थिक व्यवस्था चांगली रहावी या उद्देशाने प्रामाणिकपणे काम चालू केले.

कामगार म्हणाले.. कंत्राट पध्दतीने घेताना आमचे वेतन रक्कम रुपये २३ हजार प्रती महिना देणेचे निश्चित झाले होते. परंतु प्रत्यक्षात आमच्या हातात रक्कम रुपये १४ ते रुपये १५ हजार प्रति महिना देत होते. तरी सुध्दा आम्ही आज ना उद्या महामंडळाच्या कायम सेवेत येऊ या उद्देशाने प्रामाणिकपणे कमी वेतनावर काम करीत राहीलो. आम्ही कंत्राट पध्दतीवर कामावर येताना आमच्या राहत्या ठिकाणापासून डेपोपर्यंत नियमित तिकीट आकारले जात असे हा सरळ-सरळ आमच्यावर अन्याय होता. याबाबत विचारणा केल्यास तुम्ही कंत्राट पध्दतीवर आहात, तिकीट घ्यावेच लागेल असे सांगण्यात येत असे.एस.टी. महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता असतानासुध्दा आम्हां कंत्राटी पध्दतीच्या कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानकपणकामावरून काढून टाकण्यात आले.
या कारणामुळे आमच्या ८०० कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय झालेला आहे. आज आमच्यावर व आमच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करुन आमचा उदरनिर्वाह करीत असताना अचानकपणे अशा प्रकारची शासन व प्रशासनाकडून वागणूक मिळणे यापेक्षा वाईट काय आहे? आम्ही कोरोना परिस्थिती असताना आमच्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने महामंडळात काम केले. परंतु आम्हांला अन्यायकारक वागणूक देऊन आम्हांस हाकलून दिले, महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना नवीन कर्मचारी घेतेवेळी संकटकाळी ज्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाची सेवा केली अशा कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर खरच तुम्हांस सर्वसामान्य नागरिकांची कळकळ असेल तर संकटकाळी साथ देणारे एसटी कत्राटी चालक यांना कायम स्वरूपी सेवेत घ्या असे कत्राटी चालकांनी शासनावर टिका केली आहे.












