Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील रींगणगाव येथील ५१ वर्षीय शेतमजूराचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. मात्र शनिवारी पुराचे पाणी ओसरल्यावर या शेतमजुराचा मृतदेह हाती आल्याने गावात शोककळा पसरली आहे.

नवल त्र्यंबक सपकाळे (वय ५१) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. सपकाळे हे कामावरून संध्याकाळी परत येत असताना नाल्याला पूर आला असल्याने पुरातून निघताना त्याच्या पाय घसरला व तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. ग्रामस्थांनी त्याच्या शोध घेतला असता पाऊस चालू असल्याने अंधारात तो मिळून आला नाही. पुराचे पाणी कमी झाल्यावर शनिवारी घटनास्थळापासून थोड्या अंतरावर गावठाण जमिनी जवळील मरी माता मंदिराच्या पुढे त्याचे प्रेत आढळून आले. नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला असे तपासणीअंती एरंडोल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील, पंकज पाटील, काशीनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहेत.