जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबईच्या गोरेगावमध्ये पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात नेते रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यादरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत धक्कादायक दावा केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीत ठेवण्यात आला होता, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत धक्कादायक विधान करताना सांगितले की, ‘“शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी हे विधान जबाबदारीने करतो आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर सध्या आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी का ठेवला होता?. त्यांचं अंतर्गत काय चाललं होतं? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.

” मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते. नेमकं काय होतं? मातोश्रीमध्ये सगळी चर्चा चालू होती,” असं धक्कादायक विधान रामदास कदम यांनी केल्यावर संपूर्ण राज्यात यावरून खळबळ माजली, चर्चा सुरू झाली.












