⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटी रुपये मंजूर, नगरविकास मंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई, दि. २६ – जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचेसह दूरदृश्य प्रणालीद्वारे जळगाव महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आदी उपस्थित होते.

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी नगरविकास विभागाने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असून मुख्य रस्त्यांची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

शहरातील रस्त्यांची कामे सूचविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. या समितीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश असेल. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार असून रस्त्यांची कामे करताना ते दर्जेदार करण्यावर भर देण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीपैकी उर्वरित ५८ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असता महापालिकेने निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ नगरविकास विभागाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी नगरविकासमंत्र्यांनी दिले.

जळगाव शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने होणे आवश्यक आहेत, त्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी दिल्या.