⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

युद्धाचा परिणाम : मागणी वाढल्यामुळे साेयाबीन दरात १५०० रुपयांची वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्यस्थितीमुळे येथील आयात थांबल्याने तेलासाठी देशांतर्गत बाजारातील साेयाबीनची मागणी वाढली आहे. यामुळे देशात साेयाबीनचे दर सध्या वाढले असल्याचे दिसते आहे. सध्या बाजारात साेयाबीनचे दर क्विंटलमागे तब्बल १३०० ते १५०० रुपयांनी वधारले आहेत. यामुळे साेयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या सप्टेंबर महिन्यापासून साेयाबीनचे दर खाली आले हाेते. मागील मे महिन्यात १० हजारांवर पाेहोचलेले साेयाबीन ऐन हंगाम हाताशी आल्यानंतर साडेचार ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले हाेते. त्यात मागील दाेन महिन्यात सुधारणा हाेऊन भाव ५५०० रुपये ते ६ हजार रुपयांपर्यंत आले हाेते. या आठवड्यात त्यात तब्बल १३०० ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात साेयाबीनचे दर ७००० ते ७३०० रुपयापर्यंत पाेहोचले आहेत.

साेयाबीनच्या दरात सरासरी १५०० रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे. अर्जेटिना आणि ब्राझील या दाेन प्रमुख साेयाबीन उत्पादक देशांमधून कच्चे साेयाबीन तेल आयात केले जाते. साेबतच अर्जेटिना, रशिया आणि युक्रेन येथून सूर्यफुलाचे तेल आयात केले जाते. युद्धजन्यस्थितीमुळे येथील आयात थांबल्याने तेलासाठी देशांतर्गत बाजारातील साेयाबीनची मागणी वाढली आहे. तिकडे चीनमध्ये आधीच साेयाबीनची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणाम स्वरूप देशात साेयाबीनचे दर सध्या वाढले असल्याचे दिसते आहे.

बहुतांश शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या प्रतिक्षेत साेयाबीन विक्री केलेली नाही. बाजारभाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साेयाबीन विक्रीसाठी बाहेर काढलेले नाही. आता भाववाढ हाेत असल्याने पुढील महिन्यात शेतकऱ्यांकडून साेयाबीन विक्री केली जाण्याची शक्यता आहे. भावाच्या प्रतीक्षेत ४० टक्के साेयाबीन शेतकऱ्यांकडे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा :