⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेवर RBI चे निर्बंध; फक्त ‘इतके’ पैसे काढता येणार

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । गेल्या काही दिवसांत रिझर्व्ह बँकेने (RBI) काही बँकांवर दंड ठोठावल्यानंतर आता एका बँकेने पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे. RBI च्या वतीने मुंबईतील रायगड सहकारी बँक लिमिटेडवर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे.

15 हजार काढण्याची मर्यादा
रायगड सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी मध्यवर्ती बँकेने 15,000 रुपये काढण्याची मर्यादा लागू केली आहे. या कडकपणानंतर सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकणार नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही आणि नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही.

ही बंदी सहा महिने कायम राहणार आहे
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत आणि चालू खात्यातून 15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. बँकेवरील हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू असतील. रायगड सहकारी बँकेला दिलेल्या सूचनांचा अर्थ बँकिंग परवाना रद्द करण्याचा नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावण्यात आला
याआधी आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल दोन मोठ्या बँकांवर दंड ठोठावला होता. आरबीआयने दिलेल्या माहितीत, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेला नियामक अनुपालनाचे पालन न केल्याबद्दल प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.