जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे, जवळपास तीन महिन्यांपासून कामावर नसणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निवडला आहे.

यात म्हणजे मूळचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील प्रवीण चौधरी हे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आगारात सेवेत आहेत. एसटीच्या संपामुळं उपासमारीची वेळ आल्यानं प्रवीण यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन रसवंती सुरू केली आहे. हाताला ऊस काढण्याची सवय नाही, पण परिस्थितीनं त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. आधीच कोरोनामुळं वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचारी अडचणीत होते. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं संप चिघळला. अशा परिस्थितीत घर चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण झालंय. प्रवीण यांच्यावर म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी आहे. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं त्यांनी अखेर व्याजाने पैसे घेऊन रसवंती सुरू केली.

प्रवीण चौधरी हे 2009 मध्ये एसटी महामंडळाच्या पालघर विभागात वाहक म्हणून नोकरीला आहेत. यानंतर त्यांनी भिवंडी येथे सेवा बजावली. सध्या ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आगारात सेवेत आहेत. 12 ते 13 वर्षे सेवा झाली असली तरी त्यांच्या हातात अवघा 8 ते 9 हजार रुपये पगार येतो. एवढ्या कमी पगारदार घर चालवताना खूप कसरत होते. आता परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. पण प्रत्यक्षात ही पगारवाढ 21 ते 22 टक्केच असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. ही पगारवाढ घेऊनही फायदा नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
- ‘गोवंशाची कत्तल केली’ म्हणत ५ लाखांची मागणी; चोपड्याच्या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा
- जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? वाचा हवामान अंदाज
- जळगाव जिल्ह्यातील 31,908 शेतकरी कर्जमुक्त होणार; 184 कोटींची रक्कम जमा
- २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान ‘जिगीषा नाट्यसहवास’ चे आयोजन












