जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२५ । राज्यात मागच्या काही दिवसापासून गायब झालेला पाऊस परतला आहे. हवामान खात्यानं राज्यात पुढच्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणाला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर आज मुंबई, ठाण्यासह पुण्याला मुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यात मागच्या दोन दिवसापासून पावसाने जोर पकडला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळासह पाऊस झोडपून काढत आहे. पुढचे ३ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे शहरासह पुणे जिल्हा, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर, पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.