⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

काळजी नको! सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार ; रेल्वे आखतेय मोठी योजना, काय आहे वाचा?

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२३ । सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. याकाळात रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जातात. मात्र तरीही अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. सद्यस्थितीत वर्षभरात रेल्वेने ८०० कोटी प्रवासी प्रवास करतात. पुढच्या पाच वर्षांत प्रवाशांची संख्या एक हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. पार्श्वभूमीवर रेल्वेने मोठी योजना आखली आहे.

वेटिंग लिस्ट संपुष्टात आणण्याबरोबरच सर्वांना कन्फर्म तिकीट देण्याच्या योजनेवर रेल्वे प्रशासन गांभीर्यानं विचार करत असून,पुढील चार ते पाच वर्षांत रेल्वेचे जाळे आणखी विस्तारले जाईल. त्यात जवळपास ३००० अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन वाढवण्यात येणार आहेत.

भारतात सद्यस्थितीत मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजरची संख्या १०, ७४८ वर पोहोचली आहे. कोरोना महामारीआधी ही संख्या १०१८६ इतकी होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशभरात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने या योजनेची तयारी केली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाची वेळ दोन ते पाच तासांनी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले?
पुढील चार-पाच वर्षांत ३००० नवीन ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. प्रवाशांची संख्या वाढत आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा वेळही कमी करण्याचे लक्ष्य आहे. नवीन ट्रेन सुरू झाल्याने २०२७ पर्यंत वेटिंग तिकीटांची समस्या मार्गी लागणार आहे. सर्वांनाच कन्फर्म तिकीट मिळू शकेल, असं वैष्णव यांनी सांगितले. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, ६९००० नवीन डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. दरवर्षी जवळपास ५००० डब्यांची निर्मिती केली जात आहे. दरवर्षी ४०० ते ४५० वंदे भारत ट्रेनसह २०० ते २५० नव्या ट्रेन धावू शकतील. प्रवासाचा वेळ कमी करण्याचे लक्ष्य असून, रेल्वेकडून नेटवर्क विस्तार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे.