⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगावचा फोटो ट्विट करत पंतप्रधान मोदींनी केले शिवरायांना अभिवादन; वाचा सविस्तर…

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२१ । महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. जळगावमध्येही शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतांना जो फोटो शेअर केला आहे. तो जळगावचा आहे! त्यात माजी खासदार हरिभाऊ जावळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर, गुरुमुख जगवाणी देखील दिसत आहे. पंतप्रधानांनी शेअर केलेल्या फोटोमुळे हरिभाऊंच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

काय म्हटले आहे मोदींनी ट्विटमध्ये

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असे मोदींनी म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1494871922399596547

१३ ऑक्टोबर २०१९ रोजी जळगाव येथे झाली होती सभा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ ऑक्टोबर २०१९ रोजी जळगाव (Narendra Modi in Jalgaon) येथे भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विमानतळा समोरील मैदानावर जाहीर सभा घेतली होती. या सभेची जयारीची जबाबदारी राज्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर होती.

स्व.हरिभाऊंच्या आठवणींना उजाळा

हरिभाऊ जावळे यांनी सन १९९९ ते २००४ मध्ये त्यांनी यावल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २००३ मध्ये झालेल्या तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तसेच २००९ मध्ये १५ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून गेले होते. या काळात सलग दोन वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर पुन्हा त्यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचे नाव जाहीर केले होते. पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या सून रक्षा खडसेंना संधी देण्यात आली होती.

लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांना आमदारकीची संधी दिली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा १० हजार मतांनी पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरीष चौधरी यांनी हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे ते थेट नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयामध्ये गणले जात होते. पंतप्रधान मोदी जळगावला आल्यानंतर त्यांनी हरिभाऊ जावळे यांच्याशी संवाद साधत माहिती देखील घेतली होती. मात्र कोरोनाकाळात त्यांचे निधन झाले. आज पंतप्रधान मोदींनी त्यांचा फोटो ट्विट केल्यामुळे हरीभाऊंच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.