⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

सांगा शेतकऱ्यांने करावं काय! ३ महिन्यांत पोटॅश ७०० रुपयांनी वाढले, मिश्र खतेही महागली

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । रशिया-युक्रेन युद्धाची झळ पूर्व युरोपासह इतरही देशांना सहन करावी लागली आहे. याचा फटका भारतालाही सहन करावा लागला आहे. दरम्यान, रशिया व युक्रेन युद्धामुळे पोटॅशच्या ५० किलोच्या बॅगचे दर गेल्या चार महिन्यांत ७०० रुपयांनी वाढले. पूर्वी १ हजाराला मिळणारी बॅग आता १७०० रुपयांना मिळते.

पिकाच्या जोमदार वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यावर बोजा वाढला आहे. मान्सूनचं केरळात आगमन झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस पडताच शेतकऱ्यांची खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू होते.

यंदा मात्र खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. सगळ्याच कंपन्यांच्या खतांच्या दर वाढल्याचं दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गत तीन महिन्यांत पोटॅशचे दर १ हजार रुपयांवरून १७०० रुपयांवर पोहोचले आहेत. पोटॅश दरवाढीमुळे मिश्रखतांच्या किमतीही १०० ते २५० रुपयांनी वाढल्या. दुसरीकडे डीएपी खताचे दरही १०० रुपयांनी महागले आहे.

दरम्यान, पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यातच आता ऐन खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यात प्रामुख्याने पिकांची चांगली वाढ, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर गगनाला भिडले. भारतात पोटॅशचा पुरवठादार असलेल्या रशिया व युक्रेन युद्धामुळे पोटॅशच्या ५० किलोच्या बॅगचे दर गेल्या चार महिन्यांत ७०० रुपयांनी वाढले. पूर्वी १ हजाराला मिळणारी बॅग आता १७०० रुपयांना मिळते.

मिश्र खते २५० रुपयांनी महागली
१९:१९.१९,१०:२६:२६ या मिश्र खतांमध्ये पोटॅशचा वापर होतो. त्यामुळे पोटॅश दरवाढीने या मिश्र खतांच्या प्रति बॅगचे दर १०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. डीएपीचा भाव तीन महिन्यांपूर्वी १,२५० होता. तो आता १,३५० आहे. सर्वाधिक वापर होणाऱ्या युरियाचे दर मात्र २६६ रुपयांवर कायम आहेत.