⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

रक्षा खडसेंचा सासऱ्याला मोलाचा सल्ला; रोहित पवारांचाही घेतला समाचार

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जालन्यात मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमारामुळे विरोधकांनी राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरले आहे. यातच काल जळगावात झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली होती. आता अशातच एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) त्यांची सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा (Rohit Pawar) समाचारही घेतला आहे.

आरक्षण प्रश्नावर रक्षा खडसे यांनी सासऱ्याला चार मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे सून आणि सासऱ्यातील वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, सासरे नाथाभाऊ आता सुनेला काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे सुनेचा सल्ला?
मागच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते मिळू शकले नाही. आजही आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं सांगतानाच आरक्षणाबाबत विरोधकांनी राजकारण न करता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवा. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करायला हवं, असा सल्ला रक्षा खडसे यांनी दिला आहे. भुसावळ येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुक्ताईनगरात येऊन भाजपवर टीका केली होती. भाजप हे फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांच्या या टीकेचाही रक्षा खडसे यांनी समाचार घेतला. रोहित पवार यांनी यापूर्वी कधीच लोकांमध्ये येऊन सभा घेतली नाही. त्यांना तशी गरजही वाटली नाही. याआधी त्यांनी जळगावत सभा घेतल्या नाहीत. मग आताच का? असा सवाल त्यांनी केला.

मग त्यात वेगळं काय?
फोडाफोडीचे राजकारण राष्ट्रवादीने याआधी केलं होतं. आज वेगळं काय? आधी राष्ट्रवादीचा सहकारी अलायन्स पक्ष हा काँग्रेस होता. शिवसेना कधीच राष्ट्रवादीचा मित्र पक्ष नव्हता. शिवसेने सोबत राष्ट्रवादीने जाऊन सत्ता स्थापन केली. मग आम्ही भाजपानेही त्याच मार्गाने सत्ता स्थापन केली तर त्यात वेगळं काय?, असा सवाल रक्षा खडसे यांनी केला आहे.