⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान ! अन्यथा होऊ शकतो ‘हा’ धोकादायक आजार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । भारतातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावर तुम्हाला पाणीपुरी विकणारे दिसत असतील. पाणीपुरी… नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं असा हा पदार्थ. पण पावसाळ्यात ही पाणीपुरी खाणे आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) ठरू शकते. सध्या तेलंगणात टायफॉइडने धुमाकूळ घातला असून यासाठी आरोग्य विभागाने पाणीपुरीला कारणीभूत ठरवले आहे. तेलंगणात मे महिन्यात टायफॉइडचे २,७०० रुग्ण आढळले. त्याच वेळी, जूनमध्ये 2752 प्रकरणे नोंदवली गेली.

त्यामुळे सरकारतर्फे नागरिकांना पावसाळ्याच्या काळात स्ट्रीट फूडपासून विशेषत: पाणीपुरीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जात आहे. पाणीपुरी विक्रेत्यांनी स्वच्छतेची काळजी घेत , शुद्ध पाण्याचाच वापर केला पाहिजे, असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे. दूषित पाणी, अन्न आणि डासांमुळे पावसाळ्यात मलेरिया, डायरियासारखे आणि व्हायरल ताप अनेक आजार पसरतात. तेलंगणमध्ये डायरियाच्या 6000 हून अधिक केसेसची नोंद करण्यात आली असून डेंग्युचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत.

टायफॉइडची लक्षणे
टायफॉईडची हा आजार म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जो दूषित पाणी आणि अन्नातील साल्मानोला टाइफी बॅक्टेरियामुळे पसरतो. या आजाराच्या सुरूवातीच्या काळात ताप, पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब, कमी भूक लागणे, अशी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यावर वेळेवर उपाय न केल्यास ही लक्षणे वाढून रक्ताची उलटी, शरीराच्या अंतर्गत ब्लीडिंग होणे आणि त्वचा पिवळी पडणे, असा त्रास सहन करावा लागू शकतो.

पावसाळ्यातील आजार
भारतात सध्या मान्सून सीजन जोरात आहे. या काळात घाणेरडे, दूषित पाणी व अन्नामुळे टायफॉईडसारख्या बॅक्टेरियल आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच या काळात डासांमुळे पसरणारे आजारही वाढतात, ज्यामध्ये डेंग्यू व मलेरियाचा समावेश आहे.

या गोष्टींची घ्या खास काळजी स्वच्छता
पावसाळ्यात शरीर स्वच्छ राखणे अतिशय आवश्यक आहे. जेवणापूर्वी तसेच बाथरूमचा वापर केल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत. तसेच बाहेरुन आल्यावरही हे विसरू नये. खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल जरूर ठेवावा. सतत डोळ्यांना अथवा नाकाला हात लावू नये.

स्वच्छ, शुद्ध पाणी प्यावे
पावसाळ्यात बराच वेळा पाणी अशुद्ध येऊ शकते. त्यामुळे पिण्याचे पाणी नीट उकळू, गार करून प्यावे. बाहेर गेल्यावर कधीही उघड्यावरील पाणी पिऊ नये. नेहमी घरातून बाहेर निघताना पाण्याची बाटली सोबत बाळगावी, ती नसेल तर पॅकबंद बाटलीतील पाणी विकत घेऊन ते प्यावे. दूषित पाणी प्यायल्यामुळे डायरिया होऊ शकतो.

रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा
पावसाळ्यात नेहमी चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते. मात्र या काळात रस्त्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळा. खूपच इच्छा झाली तर सरळ घरी बनवून त्या पदार्थांचा आस्वाद घ्या. बाहेरील पदार्थांमुळे पोट बिघडण्याचा धोका असतो.