⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी! १८ जुलैपासून आता ‘हे’ खाद्यपदार्थ महागणार ; अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । आधीच देशभरात महागाईचा भडका उडाला असून यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. अशातच आता वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. पीठ, दही यांसारखे पॅकबंद खाद्यपदार्थ १८ जुलैपासून महागणार आहेत. जीएसटीच्या 47 व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
अर्थमंत्र्यांनी माहिती दिली

पनीर, लस्सी, ताक, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ, इतर तृणधान्ये, मध, पापड, अन्नधान्य, मांस आणि मासे (फ्रोझन वगळता), पफ केलेला तांदूळ आणि गूळ यासारखी कृषी उत्पादने प्री-पॅकेज्ड लेबलवर ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या वस्तू 18 जुलैपासून महागणार. म्हणजेच त्यांच्यावरील कर वाढवण्यात आला आहे. सध्या, ब्रँडेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो, तर अनपॅक केलेल्या आणि लेबल नसलेल्या वस्तू करमुक्त आहेत.

या वस्तू महाग झाल्या आहेत
इतकेच नव्हे तर, 12 टक्के जीएसटी दराच्या स्लॅबमध्ये हॉटेलच्या खोल्या (प्रति रात्र 1,000 रुपयांपेक्षा कमी दरासह) आणि रुग्णालयाच्या खोल्या (दररोज 5,000 रुपयांपेक्षा जास्त दरासह) समाविष्ट करण्याची शिफारसही परिषदेने राज्यांच्या अर्थमंत्र्यांना केली. हे दरही 18 जुलैपासून लागू होतील. याशिवाय निवडक भांड्यांवर जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

महसूल तोट्याबाबत निर्णय नाही
वर्ष 2017 मध्ये, जीएसटी 1 जुलै रोजी लागू झाला होता. त्यावेळी राज्यांना जून २०२२ पर्यंत महसुली तुटीचे आश्वासन देण्यात आले होते. वास्तविक, ही महसुली तूट जीएसटी लागू झाल्यामुळे होती. मात्र राज्यांना भरपाई देण्याबाबत जीएसटी परिषदेच्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आता ३० जूनला त्याची मुदतही संपत आहे.