⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नोबेल फाउंडेशन राबविणार ‘स्कूल चले हम’ अभियान

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दूर होते. पालक व विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाबद्दल मानसिकस्तरावर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. याबाबत विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन व्हावे म्हणून जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था नोबेल फाउंडेशनतर्फे ‘स्कूल चले हम’ अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात जळगाव शहरात तीस हजार विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. या अभियानासाठी संवेदना हॉस्पिटलचे प्रायोजकत्व लाभले आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बालमनावर होणारे मानसिक परिणाम त्यामुळे पालकत्वमध्ये निर्माण झालेल्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तसेच पालकांना टेलिफोनवर समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. अभियानांतर्गत शहरातील विवेकानंद प्रतिष्ठानचे ब.गो. शानबाग विद्यालय, प.न.लुंकड कन्या शाळा, प्रगती विद्या मंदिर, मानव सेवा विद्यालय, नंदिनीबाई विद्यालय, ला.ना.हायस्कूल, स्वामी समर्थ विद्यालय आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये देखील हा उपक्रम राबविला जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी छोटासा प्रयत्न
यावेळी बोलतांना नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी, दीड वर्ष शिक्षणापासून दूर गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल अनास्था दिसून येत आहे, तसेच अभ्यासाबद्दल अनेक समस्यांना पालक व विद्यार्थी सामोरे जात आहेत. यातून समुपदेशन विद्यार्थ्यांना बाहेर काढू शकते म्हणून हा अल्पसा प्रयत्न असल्याचे सांगितले.

पत्रकाचे विमोचन
अभियानाच्या पत्रकाचे विमोचन जळगाव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल पवार, उपायुक्त प्रशांत पाटील, संवेदना हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.संदीप पाटील, नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील आदी उपस्थित होते. अभियानासाठी राजेंद्र पाटील, अमोल पवार, हर्षल ठाकूर, योगेश पाटील, प्राजक्ता राजपूत, सुधीर महाले, विक्रांत पाटील आदी परिश्रम घेत आहेत.