जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२५ । नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जमलेल्या भाविकांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १४ महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहे. दिल्ली पोलिसांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.
महाकुंभासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून दोन स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. शनिवारी सुट्टीचा दिवस, त्यामुळे महाकुंभात जाण्यासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली. महाकुंभात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दीचा उच्चांक गाठला होता, शेकडो लोक जनरल तिकिटांसाठी जमले होते. प्लॅटफॉर्म १४ आणि १५ वर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पण दोन्ही ट्रेन उशीरा आल्या.
त्याशिवाय रेल्वे स्टेशनवर गर्दीवर नियंत्रणासाठी कुणीही नव्हते, परिणामी चेंगराचेंगरीची घटना घडली अन् १८ जणांचा जीव गेला. १० जण गंभीर जखमी आहेत. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर रात्री १० ते ११ वाजेदरम्यान दुर्घटना घडली. दरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची दुर्घटना; १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
