जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२१ । राज्यावर पाठोपाठ एक संकट येतच आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. अशातच आता हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ‘जोवाड’ असे या चक्रीवादळाचे नाव ठेवण्यात आले आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती ३ डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल. ४ डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेशच्या उत्तरेला आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागाला धडकेल. या चक्रीवादळाचे नाव ‘जोवाड’ असे ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, तर, वायव्य आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाले आहे. यामुळे हवामान बदलणार असून २ डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेशात कसे असेल हवामान?
येत्या २४ तासांच अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसंच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामानातील बदलांमुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वेगवान वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळणार आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जळगाव जिल्ह्यात काल अनेक पावसाने हजेरी तर आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून बदलत्या वातावरणामुळे थंडी वाढली आहे.











