⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

मनपा विशेष : ५ कोटी सां.बा.ला वर्ग केले मात्र पाणी पुरवठाची एनओसी न मिळाल्याने पुन्हा थांबले रस्त्याचे काम

जळगाव लाईव्ह न्यूज । मनपा विशेष । शासनाकडून मंजुर ४२ कोटींच्या कामांमध्ये वारंवार विघ्न येत असल्यामुळे पावसाळ्यापुर्वी रस्ते होतील का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आधी विविध कारणांमुळे ही कामे सुरु होऊ शकली नाही, त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपाचा हिस्सा आरटीजीएसने घेण्यास नकार दिल्यामुळे ४ दिवस सदर कामांना विलंब झाला, अखेर मनपाने मंगळवारी डी.डी.द्वारे ५ कोटी सां.बा. विभागाला वर्ग केल्यानंतर आता मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून मक्तेदाराला रस्त्यांचे काम करण्यासाठी एनओसी (ना हरकत) न मिळाल्यामुळे मक्तेदाराला काम सुरु करता येणार नसल्याचे समोर आले आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजुर झाला असून या ४२ कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे केली जाणार आहे. या निधीतील कामे करण्यासाठी अनेक विघ्न आतापर्यंत आले असून यामुळे खुप मोठा कालावधी वाया गेला आहे. असे असतांना पालकमंत्र्यांनी कामांना सुरुवात करण्याच्या सुचना दिल्यानंतर सां.बा. विभागाने मनपाचा हिस्सा ५ कोटी १० लाख रुपये आरटीजीएसने घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर ४ दिवस वाया गेल्यानंतर मनपाने मंगळवारी ५ कोटी १० लाखांचा डी.डी. सांबा. विभागाला दिला. त्यामुळे मक्तेदार काम सुरु करण्यास तयार आहे. परंतु आता मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून मक्तेदाराला कोणत्या रस्त्याचे काम करावे व त्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नसल्यामुळे रस्त्याचे काम पुन्हा थांबले आहे.

यामुळे जळगाव शहराचे रस्ते पावसाळ्यासाठी होईल कि नाही हे अजून सांगता येणे कठीण झाले आहे. आता पुढे काय होते याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. कारण लवकरात कामे पूर्ण झाली नाहीत तर नागरिकांचे हाल होणार हे नक्की आहे.