⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार ; हवामान खात्याचा ‘हा’ अंदाज वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२४ । उत्तर भारतात सध्या गोठवणारी थंडी जाणवत असून या थंडीमुळे सर्वसामान्य जनजीवनही विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यावर आलेल्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे काही ठिकाणी थंडी गायब झाली. मात्र आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, अरबी समुद्रात तयार झालेली हवेची द्रोणीय रेषा, आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसून आले.

दरम्यान आजपासून (दि.11) पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.