⁠ 
शनिवार, मे 4, 2024

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन मध्ये ’मेरी माटी मेरा देश’ या अभियानाची सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता या अभियानाची सुरुवात झाली.

त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (सन्मन्वयक, तंत्रनिकेतन), प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ.अनिल कुमार विश्वकर्मा (समन्वयक), प्रा. अतुल बर्‍हाटे (अधिष्ठाता, तंत्रनिकेतन) सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना या अभियाना बद्दल सविस्तर माहिती सांगितली.

संपूर्ण देशभर हा उपक्रम राबविला जात आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. असेही त्यांनी नमूद केले. भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणार्‍यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) उपस्थित सर्वांनी आपल्या हातामध्ये माती घेऊन घेतली.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा यांनी केले. त्यांना महाविद्यालयातील तसेच तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोणीका पाटील या विद्यार्थिनीने केले.