⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भुसावळात मैदानी कसरत करणार्‍यांना तरुणाईसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध ; खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील आरपीडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बुधवारपासून स्व.निखील खडसे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. याप्रसंगी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा आता कायापालट झाला असून भविष्यात क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी वा अन्य मैदानी खेळांना वाव मिळणार असून त्या माध्यमातून भुसावळचा नावलौकीक वाढण्यास मदत होणार आहे शिवाय मैदानी कसरत करणार्‍या तरुणाईसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केली. अनिकेत पाटील व मित्र परीवारातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत राज्या-परराज्यातील 32 संघ सहभागी झाले आहेत.

माजी मंत्री खडसे म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मैदानाची आता दुरुस्ती झाल्याने क्रीडा प्रेमींसाठी ही मोठी उपलब्धी असून विविध खेळांच्या माध्यमातून भुसावळ शहराचा नावलौकीक आता सर्वदूर पसरणार आहे. स्व.निखील हा देखील क्रीडा प्रेमी असल्याने त्यांच्या हयातीत त्यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचेही खडसे यांनी सांगितले. स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी स्व.निखील खडसे यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी माल्यार्पण केले तसेच श्रीफळ वाढवून तसेच हवेत फुगे सोडून व मान्यवरांच्या हस्ते चेंडू टोलवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

पहिल्या दिवशी या संघांनी मिळवला विजय
पहिल्या दिवशी बुधवारी व्हीसीसी व एमसीसी संघात सामना होवून एमसीसी संघ सहा विकेटने विजयी ठरला तर साईबाबा, भुसावळ व चाणक्य यांच्यात झालेल्या सामन्यात साईबाबा संघ तीन धावांनी विजयी ठरला. शिवमुद्रा व स्पार्टन यांच्यातील सामन्यात सात विकेटने स्पार्टन संघ विजयी झाला तसेच पोलिस बॉईज व अली स्वराज यांच्यातील सामना अली स्वराज संघाने दहा विकेटने पटकावला तर एमसीसी भुसावळ व स्पार्टनमधील सामना स्पार्टनने नऊ विकेट राखत जिंकला तर साईबाबा भुसावळ व अली स्वराज यांच्यातील सामना अली स्वराज संघाने नऊ विकेटने पटकावला तर अली स्वराज व स्पार्टन यांच्यातील सामना अली स्वराजने 59 धाव पटकावून जिंकला.

समारोपास माजी कप्तान मो.अझरुद्दीन उपस्थित राहणार
क्रिकेट स्पर्धा 9 ते 12 दरम्यान चालणार असून 13 रोजी स्पर्धेचा समारोप होईल तर या कार्यक्रमास भारतीय संघाचे माजी कप्तान मो.अझरूद्दीन यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. दरम्यान, प्रत्येक दिवशी सात मॅचेस होत असून एक मॅच सहा ओव्हरची असेल तर 13 रोजी सकाळी 10 वाजता सेमी फायनल व फायनल सामना होईल. हा सामना आठ ओव्हर (षटकांचा) असेल तर दुपारी तीन वाजता विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल.

हे देखील वाचा :