जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. पाचोरा आणि भडगाव तालुक्याला देखील अतिवृष्टीचा फटका बसला असून यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव तालुक्यांमध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी निकषांपेक्षा तीनपट अधिक मदत देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आज शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्याला जात असताना जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली. आमदार पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झाला असून, शेतात चिखलाचे साम्राज्य असल्याने पीक काढणी शक्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने जमिनीत पाणी साचले आहे. सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पाचोरा येथे झालेल्या पावसाची आकडेवारी
१६ सप्टेंबर – ११४.८ मिमी
२२ सप्टेंबर – १४७.८ मिमी
२३ सप्टेंबर – १३९.३ मिमी
२३ सप्टेंबरपर्यंत पाचोरा तालुक्यात सरासरी पावसापेक्षा १८९ टक्के अधिक म्हणजे २५७.८ मिमी पाऊस झाला आहे. तर भडगाव तालुक्यात २३ सप्टेंबर पर्यंत सरासरीच्या ९०.७० मिमी च्या तुलनेत १७९ टक्के पाऊस झाला आहे.











